आईलाच सांगितलं ‘लग्नासाठी मुलगी शोध’; लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या ए. आर. रहमान यांच्या होत्या या अटी


मुंबई: जगतविख्यात संगीतकार ए. आर. रहमान ०६ जानेवारी २०२३ रोजी ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रहमान यांनी संगीतविश्वामध्ये अमूल्य असं योगदान दिलं असून दाक्षिणात्य तसंच हिंदी सिनेमाविश्वात त्यांचे संगीत विशेष लोकप्रिय आहेत. परदेशातही त्यांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी रसिकांच्या मनात आणि ओठांवर आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या रहमान यांचं खासरी आयुष्य मात्र फारसं प्रकाशझोतात आलेलं नाही. त्याबद्दल कधी कुठं फारसं बोललं गेलं नाही, चर्चा झाली नाही.

ए आर रहमाननं लग्न आईनं ठरवलं
मनोरंजन विश्वामध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी प्रेम विवाह केला आहे. परंतु रहमान मात्र मनोरंजन विश्वात वावरूनही सर्वांपेक्षा कायमच वेगळे ठरले. रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानू यांच्याशी निकाह केला. या दोघांचा निकाह झाला त्यावेळी रहमान २९ वर्षांचे होता. सिमी गरेवाल यांच्या कार्यक्रमात रहमान पाहुणा म्हणून सहभागी झालेले असताना सिमी यांनी त्यांना अरेंज मॅरेज करण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी रहमान यांनी सांगितलं की, ‘त्या काळात माझ्याकडे मुलगी बघायला जाण्यासाठीही अजिबात वेळ नव्हता. त्या काळात माझ्याकडे रोजा, बॉम्बे, रंगीला यांसारखे अनेक सिनेमे होते. मी त्यात प्रचंड व्यग्र होतो.’


आईपुढे ठेवल्या या दोन अटी

रहमान यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘ कामात मी प्रचंड व्यग्र होतो. तर दुसरीकडे माझं वय वाढत चाललं होतं. त्यामुळे मला आयुष्यात लग्न करून स्थिरावायचं होतं. पण मुलगी बघायला जायला देखील माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे मी आईला लग्नासाठी मुलगी बघण्याची जबाबदारी सोपवली होती.’ रहमान यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘आईला मी फक्त माझ्या दोनच अटी सांगितल्या. त्या म्हणजे मला अशी मुलगी बायको म्हणून हवी आहे ती मला, माझ्या कामाला समजून घेऊ शकेल. माझ्या कामात ती अडचण होता कामा नये. तसंच माणूस म्हणून ती दयाळू असावी. माझ्या या अटींवर सायरा पुरेपुर उतरल्या आणि आमचं लग्न झालं.’

सायरा यांच्याशी लग्न झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल रहमान यांनी सांगितलं की, ‘ मनोरंजन विश्वात काम करत असल्यानं इथलं आयुष्य सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यापेक्षा वेगळं असतं. त्या आयुष्याशी जुळवून घ्यायला सायरा यांना सुरुवातीला थोडा वेळ लागला. परंतु हळूहलू त्यांनी या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. आता याची त्यांना सवय झाली आहे.’ आज रहमान आणि सायरा सुखानं संसार करत आहेत. या दोघांना, खातिजा, रहिम आणि अमिन अशी तीन मुलं आहेत. रहमान यांची कन्या खातिजा हिचेही अलीकडेच लग्न झाले.





Source link

Leave a Reply