एक भांडण अन् लतादीदी आणि रफी साहेबांनी एकत्र केलं नव्हतं काम, काय घडलं होतं?


Mohammed Rafi Birth Anniversary: बॉलिवूडला पडलेलं एक सुरेल स्वप्न म्हणजे मोहम्मद रफी! संगीत विश्वाने एक सुर्वणकाळ मोहम्मद रफींच्या गाण्यातून अनुभवला. आज रफी साहेबांची जयंती. २४ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या मोहम्मद रफींनी प्रेम, दु:ख, देशभक्ती, भजन, बालगीत अशा विविध भावना व्यक्त करणारी गाणी गायली. त्यांनी विविध गायक-गायकांसह काही दर्जेदार गाणी भारतीय प्रेक्षकांना दिली. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासह देखील त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की एक काळ असा होता की लता आणि रफी यांच्यामध्ये पटत नव्हते. त्यांच्यामध्ये एका कारणामुळे मतभेद निर्माण झालेले आणि हे मतभेद अनेक वर्षांपर्यंत कायम राहिले होते. एका भांडणामुळे दोन सुरेल आवाज काही वर्षांसाठी एकत्र काम करत नव्हते.

लता-रफी यांच्यामध्ये पडलेली वादाची ठिणगी

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी ही भारतीय संगीत विश्वातील दोन रत्न. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की त्यांनी एकमेकांसोबत गाणं न गाण्याची शपथ घेतली होती. त्यांच्यातील हा वाद जवळपास ३ वर्ष सुरू होता. लता आणि रफी यांच्याशी संबंधित हा किस्सा अतिशय रंजक आहे. चाहतेही आश्चर्यचकित झाले होते की असं काय नेमकं घडलं की संगीत विश्वातील या लाडक्या जोडीमधील संबंध अतिशय बिघडवले होते.

काय होतं वादाचं कारण?

साठच्या दशकातील लता-रफी वाद विशेष चर्चेत आला होता. सुपरहिट गाणी देणाऱ्या या जोडीचे नेहमीच कौतुक झाले, पण एका घटनेमुळे त्यांच्यात ३ वर्ष बातचीत बंद होती. मीडिया रिपोर्टनुसार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये वादा गाण्यासाठी मिळणाऱ्या रॉयल्टीवरुन झाला होता. लतादीदींची अशी इच्छा होती गाण्यासाठी मिळणारी रॉयल्टी संगीतकारांप्रमाणेच गायकांनाही मिळायला हवी. याउलट मत रफी साहेबांचे होते. रफी यांचे म्हणणे होते की जर गायकाला त्याच्या गाण्यासाठी मानधन मिळते तर रॉयल्टीवर त्याचा हक्क राहत नाही.

तीन वर्ष एकत्र केले नाही काम

मोहम्मद रफी यांच्या सून यास्मीन खालिद यांनीही लतादीदी आणि रफी साहेब यांच्यातील वादाच्या घटनेचा उल्लेख त्यांच्या Mohammed Rafi: My Abba – A Memoir या पुस्तकात केला आहे. त्यांनी या पुस्तकात असे लिहिले होते की, ‘१९६० च्या सुरुवातीला या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणानंतर दोघांनी एकमेकांबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात लोकप्रिय असलेल्या या दोन महान गायकांनी तीन वर्षे एकमेकांसोबत काम केले नाही.’

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची होती विभिन्न मतं

यास्मीन यांनी पुढे लिहिले की, ‘या दोघांमध्ये रॉयल्टीवरून भांडण झाले. दोघांनी जी गाणी एकत्र गायली होती त्यांची रॉयल्टी लता मंगेशकर यांना हवी होती. त्यांनी ही गोष्ट निर्मात्यांपुढे ठेवली. लतादीदींची इच्छा होती की मोहम्मद रफी यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. परंतु रफी यांना ही गोष्ट मान्य नव्हती. रफी साहेबांच्या मते निर्माते जेव्हा गायकांना गाण्याचे पैसे देतात तेव्हा त्यांच्याकडून रॉयल्टी मागणे योग्य नाही.’

एकमेकांसोबत गाण गायला केलेला विरोध

लता आणि रफी यांच्यात रॉयल्टीवरुन झालेल्या वादानंतर लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘रफीसाहेब म्हणालेले की ‘मी लताबरोबर गाणे गाणार नाही.’ मी या गोष्टीला विरोध केला. त्यांना म्हटले की, ‘रफीसाहेब एक मिनीट तुम्ही जे म्हणतात ते चुकीचे आहे. मलाच तुमच्याबरोबर गायचे नाही.’ जवळपास तीन वर्ष या दोन महान गायकांमधील वाद संपण्याची वाट पाहावी लागली. शाहिद रफींनी (मोहम्मद रफी यांचा मुलगा) एका मुलाखतीत सांगितले होते की, या दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा मिटवण्याचे काम संगीतकार जयकिशन यांनी केले. त्यांच्यामुळेच या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण झाले.



Source link

Leave a Reply