अहो काकू हो बोला ना! राजची अवस्था नेटकऱ्यांना पाहवेना; कमेंटमध्ये कावेरीला करतायत विनंती


मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका ‘भाग्य दिले तू मला’ने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकार यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे. मालिकेतील कावेरी आणि राजवर्धन यांची जोडीही प्रेक्षकांना भलतीच पसंत पडली आहे. प्रेक्षक त्यांच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र मालिकेत दाखवण्यात येणारं कथानक आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारं आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मालिकेत राज आणि कावेरी यांमध्ये दाखवण्यात येणारा दुरावा आता प्रेक्षकांनाही असह्य झाला आहे. त्यामुळे नेटकरी कावेरीला राजवर्धनला होकार देण्याची विनंती करत आहेत.


मलिकेत सुरू असणाऱ्या कथानकानुसार, कावेरीचं राजवर प्रेम असूनही ती वैदेहीसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करते. वैदेहीला हे ठाऊक असूनही ती कावेरीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताना दिसतेय. तर राज मनात नसतानाही वैदेहीसोबत लग्नाला तयार झाला आहे. राज आणि वैदेही यांचा साखरपुडाही पार पडला आहे. आता तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात येत आहेत. मात्र यातच राज एक युक्ती लढवताना दिसणार आहे. तो पत्रिकेवर त्याच्या आणि वैदेहीच्या ऐवजी त्याचं आणि कावेरीचं नाव छापून आणणार आहे. सोबतच अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत तिला परिस्थितीची जाणीव करून देणार आहे. आता ही पत्रिका पाहून तरी कावेरी त्यांच्या लग्नाला होकार देणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

आता नेटकरीही त्यांचा हा दुरावा पाहून व्यथित झाले आहेत. त्यांनाही कावेरी आणि राज यांचं लग्न पाहायची घाई लागली आहे. त्यामुळे नेटकरी मालिकेच्या प्रोमोखाली कमेंट करत कावेरीला हो म्हणण्याची विनंती करताना दिसतायत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘हो काकू हो बोलून टाका ना’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘आता त्या राजची अवस्था पाहवत नाही ओ काकू होकार देऊन टाका ना.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘तिने मैत्रिणीसाठी हे केलं पण तिला तर त्याचं काहीच नाही. तुम्ही हो बोलून टाका ना.’ अशा प्रतिक्रिया देत अनेक नेटकऱ्यांनी कावेरीला विनंती केली आहे. आता खरंच ही पत्रिका पाहून कावेरी राजला होकार देणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.





Source link

Leave a Reply